Bihar Police AK-47 Firing : बिहारमध्ये NEET पेपर लीक विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी AK-47 ने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
पाटणा : नीट पेपर लीकमुळे सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता फक्त रस्त्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. बिहारमधील सिवानमध्ये 'बिहार बंद' दरम्यान घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ समोर येताच प्रशासनाने तातडीने कारवाई करत त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं, पण प्रकरण इथेच थांबलेलं नाही. आता हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला असून, राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी जनहित याचिका दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
गोळी झाडताना कॅमेऱ्यात कैद
25 जुलै रोजी NEET पेपर लीकच्या विरोधात पुकारलेल्या 'बिहार बंद' दरम्यान सिवानसह अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. सुरुवातीला आंदोलन शांततेत सुरू होतं, पण परिस्थिती झपाट्याने बिघडली. याच दरम्यान व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) चे सदस्य असलेले बिहार पोलीस अधिकारी अभिषेक पटेल, AK-47 रायफलमधून किमान तीन राऊंड फायर करताना दिसले. हा व्हिडिओ व्हायरल होताच, गर्दी नियंत्रणासाठी इतक्या घातक शस्त्राचा वापर का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
निलंबनानंतर चौकशी सुरू
व्हिडिओ समोर आल्यानंतर बिहार पोलिसांनी अधिकारी अभिषेक पटेल यांना तात्काळ निलंबित केलं. आता त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत, शस्त्राचा वापर पोलिसांच्या निश्चित कार्यपद्धतीनुसार होता की नाही, हे तपासलं जाईल. नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास शिस्तभंगाच्या कारवाईसोबतच कायदेशीर पाऊल उचललं जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
तीन गोळ्या, तीन जखमी, १५ वर्षांच्या आरिफची चर्चा
या हिंसाचारात तीन आंदोलक जखमी झाले असून, त्यांच्यावर पाटण्याच्या जयप्रभा मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात १५ वर्षीय मोहम्मद आरिफची सर्वाधिक चर्चा होत आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो कोणत्याही आंदोलनात सहभागी नव्हता, तर दुकान बंद करून घरी परतत होता. त्याचवेळी त्याच्या मानेला गोळी लागली. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून गोळी काढली असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या FIR दाखल केल्या आहेत. यात सुमारे १०० जणांना आरोपी बनवण्यात आलं आहे, तर जवळपास २०० अज्ञात लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सतत छापेमारी करत आहेत. आतापर्यंत सिवानच्या सदर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर सुमारे २५ आरोपींना थेट तुरुंगात पाठवण्यात आलं आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं प्रशासनाने म्हटलं आहे.
प्रकरण सुप्रीम कोर्टात
हे प्रकरण फक्त बिहारपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. राष्ट्रीय जनता दल (RJD) चे राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी या क्रूरतेविरोधात थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मनोज झा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांवर AK-47 चालवल्याच्या घटनेची स्वतंत्र चौकशी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या दोन्ही मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावर सरकारला धारेवर धरलं.
पोलिसांची बाजू काय आहे?
कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आपली प्राथमिकता आहे आणि कोणत्याही अधिकाऱ्याने नियमांचं उल्लंघन केल्यास ते गांभीर्याने घेतलं जाईल, असं बिहार पोलिसांचं म्हणणं आहे. विभागीय चौकशीनंतरच AK-47 चा वापर परिस्थितीनुसार योग्य होता की नाही, हे स्पष्ट होईल. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल.

