‘हनुमान अंश’ सिनेमाचं यश म्हणजे 'महाराज जी' (नीम करौली बाबा) यांचा चमत्कार आहे, असं निर्मात्या अनुपिया नागर यांनी म्हटलं आहे. या सिनेमासाठी त्यांनी आपली सगळी जमापूंजी लावली होती.
मुंबई : ‘हनुमान अंश’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून प्रेक्षकांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची कथा आणि त्यातील आध्यात्मिक विषयांवरून एक नवीन संवाद सुरू झाला आहे. या सिनेमाच्या यशावर बोलताना निर्मात्या अनुपिया नागर यांनी याला 'महाराज जी' (नीम करौली बाबा) यांचा चमत्कार म्हटलं आहे. सिनेमाच्या निर्मितीतील आव्हानांपासून ते प्रेक्षकांच्या पसंतीपर्यंतच्या प्रवासावर त्यांनी आपलं मत मांडलं.
निर्मातीची मोठी उडी
“हा सिनेमा तीन महिलांनी मिळून तयार केला आहे आणि मी त्यातली सगळ्यात तरुण आहे. मी पोस्ट-प्रोडक्शनच्या टप्प्यात टीममध्ये सामील झाले. टीमने मला सांगितलं की सिनेमा तयार झाला आहे, पण पोस्ट-प्रोडक्शनसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मी माझी सगळी जमापूंजी या सिनेमात गुंतवली, कारण मला या सिनेमाशी भावनिकरित्या जोडल्यासारखं वाटलं. हा माझ्यासाठी खूप भावनिक प्रोजेक्ट आहे. महाराज जींनी (नीम करौली बाबा) लॅरी ब्रिलियंट आणि स्टीव्ह जॉब्ससारख्या अनेक परदेशी लोकांना प्रेरणा दिली, पण भारतात त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची जीवनकथा लोकांना कळावी आणि त्यांनी त्यांच्या आश्रमाला भेट द्यावी, अशी माझी इच्छा आहे,” असं त्यांनी ANI शी बोलताना सांगितलं.
निर्मितीतील भूमिकेबद्दल गैरसमज दूर
यावेळी अनुपिया यांनी सिनेमाच्या निर्मितीमधील त्यांच्या भूमिकेबद्दलचा एक गैरसमजही दूर केला. नागर यांच्या म्हणण्यानुसार, 'हनुमान अंश'ची निर्मिती तीन महिलांनी केली असून, त्यापैकी त्या सर्वात तरुण आहेत. “संपूर्ण सिनेमाची निर्मिती मी एकटीने केली आहे, असा एक गैरसमज आहे, पण ते खरं नाही. मी एकूण बजेटच्या एक तृतीयांश वाटा उचलला आहे. हो, आम्ही गुंतवलेले पैसे परत मिळाले आहेत आणि सिनेमा चांगली कमाईही करत आहे. हा सिनेमा इतकं यश मिळवतोय, हा महाराज जींचा चमत्कारच आहे, असा संपूर्ण टीमचा विश्वास आहे,” असंही त्या म्हणाल्या.
'हनुमान अंश'बद्दल थोडक्यात
‘हनुमान अंश’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केलं आहे. हा सिनेमा नीम करौली बाबा, जे महाराज जी म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्या जीवन आणि शिकवणीवर आधारित आहे. सिनेमाच्या प्रेस रिलीझनुसार, त्यांचे भक्त त्यांना भगवान हनुमानाचा अवतार मानतात. प्रेम, भक्ती आणि सेवा यावर आधारित शिकवणीसाठी ते ओळखले जात होते.

