
मुसळधार पावसामुळे भिवंडीतील बाजार परिसरात गंभीर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. सलग तीन ते चार दिवस साचलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुकानांमधील मालाचे नुकसान होत असून दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. या बाजारात सुमारे 200 ते 300 दुकाने असून जवळपास सर्वच व्यापाऱ्यांवर या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. भाजीपाला आणि इतर वस्तूंचे नुकसान वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी काढण्याची व्यवस्था करावी तसेच नुकसानाचे पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.