
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 29 ऑगस्टला अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे. स्वतःचा दौरा झाला नाही तरी गावागावात बैठका सुरू करा आणि घराघरात जाऊन 29 ऑगस्टला अंतरवालीत जाण्यास सांगा, असे त्यांनी म्हटले. मराठ्यांची एकही मागणी मागे ठेवायची नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सारथीच्या बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. 30 मेच्या आंदोलनानंतर काढलेल्या जीआरची तीन महिन्यांनंतरही अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन पूर्ण फी भरल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. बलिदान गेलेल्या कुटुंबांना नोकरी आणि आर्थिक मदत देण्याबाबत विविध मंत्रालयांनी जीआर काढले आहेत का, असा सवाल त्यांनी केला. आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या केसेस मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याचाही त्यांनी आरोप केला. अभ्यासकांनी समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगत, जीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आपण तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. मात्र अभ्यासकांच्या भूमिकेत वारंवार बदल होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मराठा समाजाच्या हक्कांवर अन्याय झाल्यास त्याला राजकीय उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ओबीसी समाजाला आपला विरोध नसल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील गरीब मराठा आणि ओबीसी समाजातील मुलांचे कल्याण झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र काही नेते ओबीसी समाजाच्या नावावर राजकीय आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.