आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध स्थानिक प्रश्नांसह तिरंगा रॅलीवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली. वरळीमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपासून मुख्यमंत्र्यांना सतत यावे लागत असल्याचे सांगत त्यांनी मुंबईतील विकासकामांचा उल्लेख केला. तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावर बोलताना, देशभर तिरंगा रॅली होत असताना तरुण-तरुणी रस्त्यावर आले होते, तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्या वेळी तिरंगा का आठवला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच आदित्य ठाकरे यांनी वरळीतील सेंच्युरी मिल पुनर्विकास, स्थानिकांना घरे, पाणी आणि शाळांचे प्रश्न, मुंबईतील मोकळ्या जागा, महापालिकेच्या ठेवी, रस्ते, कचरा, शाळांना साहित्य, कोळीवाडे आणि धारावीतील जागांच्या मुद्द्यांवरही भूमिका मांडली. मुंबईतील जागा बिल्डर आणि कंत्राटदारांच्या ताब्यात जाण्याचा आरोप करत या मुद्द्यांवर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.