मुंबईत काल झालेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका सर्वंच गोष्टींवर झाला. अशातच आजच्या दिवसाठी हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय रत्नागिरी-रायगडमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर परिस्थिती गंभीर झाली आहे. मुंबईतील कुर्ला, भांडुपसह अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले, समुद्रात भरती आली आणि मच्छिमारीवर बंदी घालण्यात आली आहे. आज, 20 ऑगस्ट रोजीदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे.
26
मुंबईत ऑरेंज अलर्ट कायम
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांना रेड अलर्ट होता, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणसह मुंबई उपनगरातून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. आज मुंबईत ऑरेंज अलर्ट आहे. शहरातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस तर उपनगरांमध्ये मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना बाहेर पडताना वाहतुकीकडे आणि लोकल वेळापत्रकाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
36
नवी मुंबई व ठाण्यात सावधानतेचा इशारा
नवी मुंबई आणि ठाणे या भागांनाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे ठाण्यातील खाडी परिसर आणि नवी मुंबईतील नाल्यांचा पाणीस्तर वाढला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळे येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डहाणू व वसई-विरार परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रेल्वे सेवांवरही परिणाम झाला असून डहाणू लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी असल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. किनारी भागांमध्ये जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
56
रायगड-रत्नागिरीत पूरस्थितीची शक्यता
कोकणातील रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. नद्यांना पूर येण्याची, तसेच डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्हा ऑरेंज अलर्टवर असून, मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.
66
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम पाऊस होईल, मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणावर भरती आणि जोरदार वारे वाहतील. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.