मुंबई - आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाले असून लाखो समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. या दरम्यान मुंबईच्या खाऊगल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आंदोलकांची मोठी उपासमार होणार असल्याचे दिसून येते.
मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील खाऊगल्ल्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या हजारोंच्या संख्येतील लोकांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून मोर्चात सहभागी आंदोलकांना जेवणाची मोठी गैरसोय होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
25
रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
या निर्णयावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिले की –
“आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु जर सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल, तर ते हुकूमशाहीचे लक्षण आहे.”
35
खाऊगल्ल्या सुरू करा
पुढे टीका करताना त्यांनी म्हटले की, “मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. गर्दी होणार असल्यास उलट खाऊगल्ल्या सुरू ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात.”
यासोबतच रोहित पवार यांनी आझाद मैदानावर आंदोलकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. सध्या मैदानावर अशी कोणतीही पुरेशी सोय नसल्यामुळे लाखो आंदोलनकर्त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
55
सुविधांवरुन राजकीय वादळ
मुंबईतील मराठा आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले असून, आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय वादळ उठले आहे.