
नवी मुंबई: कर्जत–पनवेल मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे तब्बल 80 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2026 पर्यंत या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सध्या या मार्गावर मालगाड्यांची संख्या मोठी असल्याने प्रवासी गाड्यांना वारंवार विलंबाला सामोरं जावं लागतं. मात्र दुहेरी मार्ग उपलब्ध झाल्यानंतर प्रवासी आणि मालगाड्या स्वतंत्र ट्रॅकवरून धावतील, ज्यामुळे वाहतूक अधिक सुटसुटीत, जलद आणि वेळेवर होणार आहे.
29.6 किमी लांबीचा प्रकल्प, जानेवारी 2021 मध्ये सुरू
कोरोना काळातील अडथळ्यांनंतर कामाला पुन्हा गती
3 मोठे बोगदे, 44 पूल, 15 भुयारी मार्गिका, बहुतेक काम पूर्ण
उर्वरित 20% काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे MRVCचे नियोजन
या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सीआरएस (Commissioner of Railway Safety) चाचण्या, ज्यांचे आयोजन फेब्रुवारी 2026 मध्ये केले आहे.
या चाचण्यांमध्ये
मार्गाची तांत्रिक क्षमता
प्रवासी व मालवाहतूक सुरक्षितता
सिग्नलिंग व सुविधांची पडताळणी
सर्व तांत्रिक घटकांची तपासणी होईल. प्रमाणपत्र मिळताच मार्गावर नियमित लोकल चालू होणार आहे.
या मार्गावरील पनवेल, मोहोपे, चिखले, चौक आणि कर्जत ही पाचही स्थानके जवळपास तयार आहेत. प्लॅटफॉर्म, सिग्नलिंग आणि इतर सुविधा अंतिम टप्प्यात आहेत.
कर्जत ते सीएसएमटी सध्या
जलद लोकल : सुमारे 2 तास
धीमी लोकल : 2.5 तास
नव्या दुहेरी मार्गामुळे पनवेलमार्गे प्रवास करताना साधारण 30 मिनिटे वाचणार आहेत.
याशिवाय
प्रवासी लोकलची संख्या वाढणार
विलंबात मोठी घट
दैनंदिन प्रवास अधिक आरामदायक व जलद होणार
हा संपूर्ण प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे नेटवर्कसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
2,782 कोटींचा हा प्रकल्प
दुहेरी लोहमार्ग
पूल
भुयारी मार्गिका
उड्डाणपूल
आधुनिक सिग्नल आणि सुरक्षा प्रणाली
यांसह तांत्रिकदृष्ट्या सक्षम मार्ग तयार करतो.
उड्डाणपुलांवरील गर्डर लाँचिंगची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. या मार्गामुळे मुंबई–पुणे–कोकण दिशेची रेल्वे वाहतूक अधिक मजबूत आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाचा सर्वात उल्लेखनीय भाग म्हणजे वावर्ले बोगदा. 2265 मीटर लांबीचा हा टनेल आता मुंबई उपनगरी नेटवर्कमधील सर्वात लांब बोगदा ठरला आहे. याआधीचा विक्रम असलेल्या ठाणे–दिवा (पारसिक बोगदा – 1300 मीटर) च्या लांबीला मागे टाकत हा नवा टनेल चर्चेत आहे. याशिवाय नढाळ (299 मी.) आणि किरवली (300 मी.) हे दोन बोगदेही मार्गाच्या सुरक्षितता व दर्जास अधिक मजबुती देतात. या तिन्ही बोगद्यांमुळे दुहेरी मार्ग अधिक सुरक्षित, भूकंपप्रतिरोधक आणि वेगवान बनला आहे.
मार्च 2026 पासून लोकल धावू लागल्यानंतर कर्जत–पनवेल हा मार्ग उपनगरी नेटवर्कमधील नवा महत्वाचा दुवा ठरणार आहे. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, विश्वासार्ह आणि आरामदायक करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे.