पूर्व महाराष्ट्र उष्णतेने त्रस्त असताना, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला मान्सूनपूर्व पावसाने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज असून, तापमान ३३°C ते ३५°C दरम्यान असेल. मात्र, संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.
ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही दिवसाच्या उत्तरार्धात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने या भागांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्यानुसार, आगामी दिवसांत वादळी पावसाची शक्यता असून, दिवसा तापमान ३५°C ते ३७°C दरम्यान राहील. पुण्याव्यतिरिक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांतही वादळी वारे आणि पावसासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.