Maharashtra Rain : राज्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसानंतर बुधवारी जोर ओसरला. मुंबईत पुढील दोन-तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज असून तापमान वाढले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मोसमी पावसाने गेले दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, तर काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी झाला आणि फक्त ठराविक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
24
विदर्भ- मराठवाड्यात पावसाची शक्यता
विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र हे क्षेत्र विरल्यानंतर आता मराठवाड्यावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.
34
मुंबईत पावसाची विश्रांती
मुंबईत मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहर आणि उपनगरात हलक्या सरी पडल्यानंतर आत्तापर्यंत फारसा पाऊस झालेला नाही. पुढील दोन-तीन दिवस मुंबईतही पावसाची शक्यता कमी आहे. पावसाला ओढ बसल्यामुळे तापमानात पुन्हा वाढ झाली असून, बुधवारी कुलाबा केंद्रात २९.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्रात ३०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून राज्यभर पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी पडतील तर काही ठिकाणी अधूनमधून पाऊस होईल. मुसळधार पावसाची शक्यता मात्र कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून मंगळवारी आणखी काही भागांतून वाऱ्यांची माघार घेतली आहे.