राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. अशातच गणेशोत्सवाला एक दिवस राहिला असता राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. जाणून घ्या कोकण ते मुंबईमधील पावसाचा अंदाज…
गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त एक दिवस उरला असताना राज्यभरात तयारी जोरात सुरू आहे. मात्र त्याआधीच, 26 ऑगस्ट 2025 रोजी कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीच्या स्वागताच्या तयारीत हवामान अडथळा ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
25
मुंबईत पावसाचा जोर वाढला
सोमवारपासून मुंबई आणि उपनगर भागात जोरदार पावसाने सुरुवात झाली आहे. यामुळे हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासून सतत जोरदार सरी कोसळत असून दुपार आणि संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
35
नवी मुंबई आणि ठाण्यात अलर्ट
मुंबईप्रमाणेच नवी मुंबई व ठाण्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यातील घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक राहील. तर नवी मुंबईतील खाड्यालगतच्या भागात पाण्याचा निचरा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात आठवड्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली आहे. आज येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश कायम ठेवले गेले आहेत.
55
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील पावसाचा अंदाज
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार सरींचा अंदाज असून काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, मात्र काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.