Weather Alert : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसह कोकणासाठी पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी 13 सप्टेंबरपासून हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील हवामान स्थिर राहिले आहे. सलग दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमी झाला असून केवळ रिमझिम सरी कोसळत होत्या. मात्र आता हवामानात बदल दिसून येणार असून 13 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत आज (12 सप्टेंबर) पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, पण मुसळधार पावसाची शक्यता नाही. सकाळ-संध्याकाळी आभाळ ढगाळ राहील. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडाही जाणवेल. शनिवारीपासून शहरात दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
35
ठाणे-नवी मुंबईतही अधूनमधून सरी
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही हवामान परिस्थिती जवळपास सारखीच राहणार आहे. येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल. तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. समुद्रकिनाऱ्याजवळ हलक्या वाऱ्याचा अनुभव मिळेल. 13 सप्टेंबरपासून या भागात पावसाचा जोर वाढणार आहे.
पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. किनारपट्टी भागांत ढगाळ वातावरण राहील, तर ग्रामीण भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी-जास्त होईल. दिवसभर हलक्या वाऱ्याची झुळूक जाणवेल.
55
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पावसाचा अंदाज
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही आज पावसाचे प्रमाण मिश्र राहील. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, तर डोंगराळ आणि किनारी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. वातावरण दमट राहील आणि तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. 13 सप्टेंबरपासून कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस परतेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.