
Maharashtra Weather : मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. एका बाजूला उष्णतेची तीव्र लाट तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाची हजेरी अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने राज्यातील अनेक भागांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. सोमवारी तापमान 36 अंशांवर गेले असून मंगळवारी ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दमट वातावरणामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहे.
तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी 12 ते 5 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. या काळात उन्हाचा कडाका अधिक असल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. अत्यावश्यक काम असल्यास टोपी, रुमाल आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उष्णतेसोबतच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह काही भागात अजूनही पावसाची शक्यता कायम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होईल, मात्र त्यानंतर उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.