
Ladki Bahin Yojana Maharashtra : महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय जाहीर केला. या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
विकसित भारत नारी शक्ती संगम या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या भाईंदर येथील प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विनायक सहस्रबुद्धे होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री प्रतापराव पवार तसेच मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी ‘लाडकी बहीण’ योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत महिलांना व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. विशेष म्हणजे या कर्जाच्या परतफेडीसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत वापरता येणार आहे.
या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी शासनाच्या ‘UMED Program’ या उपक्रमामार्फत केली जाणार आहे. जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’मध्ये महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळेल आणि त्या उद्योग क्षेत्रात मोठ्या कंपन्यांनाही स्पर्धा देऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांचा आढावा घेतल्यास सर्वसाधारण योजनांमध्ये कर्ज परतफेडीचे प्रमाण सुमारे ५० टक्के असल्याचे दिसते. मात्र महिलांना बचत गट किंवा इतर योजनांमधून दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महिलांमध्ये आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापनाची क्षमता अधिक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.