तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, पत्रकार परिषदेत काय केला खुलासा?

Published : May 16, 2026, 06:45 PM IST
SUNIL TATKARE

सार

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका स्पष्ट करत सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष असल्याचे सांगितले आहे. पत्रावरून निर्माण झालेल्या संभ्रमानंतर पक्षाने पत्रकार परिषद घेऊन या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले. यावेळी नेत्यांनी रोहित पवार यांच्यावरही राजकीय फायद्यासाठी अजित पवारांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप करत टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांच्या चर्चांदरम्यान पक्षाने अखेर अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मोठं स्पष्टीकरण दिलं.

पत्रकार परिषदेत काय झालं? 

पक्षाचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर येत सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याचं स्पष्ट केलं. तसेच प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष पदावर कायम असल्याचंही सांगण्यात आलं. पक्षात कोणतेही मोठे बदल झालेले नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या त्या पत्रामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

बातम्या खोट्या पसरवल्या 

दरम्यान, दिल्लीतील पक्ष कार्यालयात तटकरे आणि पटेल यांना प्रवेश नाकारल्याच्या बातम्यांवरही पक्षाने प्रतिक्रिया दिली. अविनाश आदिक यांनी अशा बातम्या चुकीच्या असून काही जणांकडून हेतुपुरस्सर अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. संबंधित वृत्तांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. रोहित पवार हे अजित पवार यांच्या नावाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला. बारामतीच्या राजकारणावरूनही त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि संघटनात्मक बदलांच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाने जरी सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला असला तरी आगामी काळात या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maratha Reservation Agitation : ‘सरकारकडून वारंवार विश्वासघात’; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, नव्या आंदोलनाचे संकेत
Missing Link Accident : मिसिंग लिंक पुन्हा चर्चेत; बसची तीन वाहनांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू