
Maratha Reservation Agitation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत “सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाला” असा हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाशिवाय आता पर्याय उरलेला नसल्याचे सांगत त्यांनी नव्या आंदोलनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “ज्या दिवशी तारीख जाहीर करू, त्याच दिवशी आंदोलन सुरू होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे यांनी सरकारला थेट सवाल करत, “आठ महिने उलटून गेले तरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का देण्यात आले नाही?” असा जळजळीत प्रश्न उपस्थित केला. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी अजूनही प्रलंबित असल्याची भावना समाजात वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम ठप्प असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या बैठकीनंतर मनोज जरांगे समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेंची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीचा आणि आजच्या बैठकीचा काही संबंध आहे का, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते. त्यावेळी “आपण जिंकलो” अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर हैदराबाद गॅझेटचा प्रत्यक्ष लाभ मराठा समाजाला मिळालेला नसल्याची भावना समाजात निर्माण झाली. केवळ ३०८ नोंदी सापडल्याचे समोर आल्यानंतर समाजातील असंतोष अधिक तीव्र झाला आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये, तालुक्यांत आणि बाजारपेठांमध्ये मराठा समाजाने यापूर्वी मोठ्या प्रमाणावर मोर्चे आणि आंदोलने केली होती. वाशीपासून मुंबईपर्यंत मराठा आंदोलनाची ताकद राज्याने पाहिली. आता अंमलबजावणी न झाल्याच्या मुद्द्यावरून जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचे संकेत दिले आहेत. आज ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते नेमकी कोणती घोषणा करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अलीकडेच मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता, या बैठकीनंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.