
BMC Election 2026 : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) महापालिकांसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह प्रमुख महापालिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
ही महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडली. रात्री उशिरा सुरू झालेली चर्चा पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीत जागांची संख्या, विशिष्ट प्रभागांमधील राजकीय ताकद आणि निवडून येण्याची क्षमता या मुद्द्यांवर सविस्तर विचारविनिमय झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांचा आदर राखत व्यावहारिक निकषांवर जागावाटप ठरवले आहे.
या बैठकीला केवळ वरिष्ठ नेतेच नव्हे, तर समन्वयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि सरचिटणीस राहुल शेवाळे उपस्थित होते. मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी या नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बैठकीदरम्यान वातावरण खेळीमेळीचे होते आणि आकडेमोडीसोबतच विविध विषयांवर हास्यविनोदही रंगले.
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवरही दीर्घकाळ चर्चा झाली. उपस्थित नेत्यांनी मोदींसोबतचे वैयक्तिक अनुभव, तसेच त्यांच्या नेतृत्वातून मिळालेली प्रेरणा एकमेकांशी शेअर केली. या चर्चेने बैठकीतील वातावरण अधिक सकारात्मक झाल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी सुमारे १५० जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे आधीच एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांबाबतही तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईसह MMR मधील इतर महापालिकांमध्ये महायुती एकसंधपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महायुतीचा मुख्य जागावाटप फॉर्म्युला ठरला असला तरी येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागनिहाय उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महायुतीकडून पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणूक रणधुमाळीला वेग येणार आहे.