
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मांडलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले. संविधान हे नरेंद्र मोदींपेक्षा मोठे असून सर्वोच्च न्यायालयही मोदींपेक्षा मोठे आहे, असे राऊत म्हणाले. शिवसेना आणि खासदारांच्या फुटीच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. महाविकास आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सोडून कोणीही कुठेही जात नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीवरही राऊत यांनी टीका केली. संसदीय परंपरा आणि विरोधी पक्षाचा सन्मान जपण्याबाबत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या संसदीय कार्याचा संदर्भ दिला. याशिवाय शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या भवितव्यावर भाष्य करत संजय राऊत यांनी हे गट लवकरच भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण आणि संविधानातील तरतुदींचा त्यांनी यासाठी संदर्भ दिला. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरही राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. खड्ड्यांमुळे नागरिक जखमी होत असल्याचा दावा करत त्यांनी नाशिकमध्ये शिवसेनेकडून मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. नाशिकमधील रस्ते, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील कामे आणि ठेकेदारीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.