
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून प्रश्न उपस्थित केले. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले असून माणगाव बायपासचे कामही मोठा अडसर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. त्यावेळी कंत्राटदार कंटाळून पळून गेल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. मात्र कंत्राटदार का पळून गेले आणि स्थानिक राजकीय हस्तक्षेप किती आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणातील रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. कोकणातील विकासाला आपला विरोध नसल्याचे सांगत स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्व आमदार एकत्र आले असते तर मुंबई-गोवा महामार्गाला इतकी वर्षे लागली नसती, असेही त्यांनी म्हटले. तसेच कोकणातील स्थानिकांनी जमिनी विकण्याऐवजी उद्योगांमध्ये भागीदार व्हावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. स्थानिक तरुणांना रोजगार आणि नोकऱ्या मिळणार आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.