
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि घाट परिसरात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गिरीश महाजन यांनी नागरिकांना पर्यटनस्थळांवर जाणे टाळण्याचा सल्ला दिला. धबधबे, नद्या आणि धरण परिसरात सेल्फी किंवा फिरण्यासाठी जाण्यामुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.