
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांचा आढावा घेतला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. संबंधित अहवाल प्राप्त झाला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल. आजच्या कॅबिनेट बैठकीत त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. कल्याणमधील प्रीमियर कंपनीच्या जमीन प्रकरणात SIT नेमण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चौकशीचा अहवाल आल्यानंतर नाना पटोले यांनी विधानमंडळात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. दिशा सालियन प्रकरणात CBIची निष्पक्ष चौकशी होईल आणि सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक असून देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असले पाहिजेत, अशी भूमिकाही बावनकुळे यांनी मांडली. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावर बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेवर जनतेने विश्वास दाखवल्याचे म्हटले.