एकेकाळी युद्धांमधून अब्जावधी डॉलर्स कमावणारा पाकिस्तान आता अमेरिका-इराण संघर्षामुळे कंगाल झालाय. ज्या भौगोलिक स्थानामुळे पाकिस्तानला नेहमीच फायदा व्हायचा, तेच आता त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरलं आहे. वाचा सविस्तर.
पाकिस्तानने नेहमीच युद्धांमधून पैसा कमावला आहे. १९७९ मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला, तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स दिले. एकट्या १९८० च्या दशकात पाकिस्तानमध्ये २० ते २७ अब्ज डॉलर्सची परकीय मदत आली. २००१ च्या 9/11 हल्ल्यानंतरही अमेरिकेने पाकिस्तानला १३ अब्ज डॉलर्सहून अधिक लष्करी आणि आर्थिक मदत दिली. यामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा प्रचंड वाढला होता.
25
पाकिस्तानला फायद्याऐवजी नुकसान
पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे पाकिस्तानला फायद्याऐवजी मोठं नुकसान सोसावं लागतंय. त्याच्या परकीय चलन साठ्याला मोठी गळती लागली आहे. यावर्षी पाकिस्तानमधून ५.७ अब्ज डॉलर्स बाहेर गेले आहेत, तर त्याचा एकूण राखीव साठा फक्त १६ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) तर पाकिस्तानला एप्रिलच्या अखेरपर्यंत त्यांचे ३.५ अब्ज डॉलर्स परत करण्यास स्पष्टपणे सांगितलं आहे.
35
पाकिस्तानला मदतीचा हात
पाकिस्तानला पूर्णपणे बुडण्यापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबिया आणि कतारने ५ अब्ज डॉलर्सच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे. ही मदत त्याच्यासाठी उपयोगी ठरू शकते, पण हा 'ऑक्सिजन' किती काळ टिकेल, हे कोणालाच माहीत नाही.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था थेट होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) अवलंबून आहे. पाकिस्तान आपल्या गरजेच्या ८०-८५% तेल आणि गॅस याच मार्गाने आयात करतो. इराण-अमेरिका तणावामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचं आयातीचं बिल (Import Bill) गगनाला भिडलं आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पहिली फेरी अयशस्वी ठरली. दुसरी फेरी तर सुरू होण्याआधीच बारगळण्याची चिन्हं आहेत, कारण इराणने यात कोणताही रस दाखवलेला नाही.
55
पाकिस्तानची अशी होऊ शकते स्थिती
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा पाकिस्तानकडे तेल आयात करण्यासाठी पैसे उरणार नाहीत आणि परदेशी कर्जाचा बोजा वाढेल, तेव्हा त्याचा थेट परिणाम तिथल्या सामान्य जनतेवर होईल. तिथे पेट्रोलच्या किमतींनी आधीच उच्चांक गाठला आहे आणि आता वीज-गॅसचं संकटही अधिक गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढू शकतात.