
Mumbai Weather : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेनंतर शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाल्याने मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा फार काळ टिकणार नसल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ८ आणि ९ मार्च रोजी मुंबई महानगर प्रदेशात पुन्हा उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी मुंबईतील तापमानात किंचित घट नोंदवली गेली. सांताक्रूझ येथे ३४.६ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ही दोन्ही तापमान सरासरीपेक्षा सुमारे चार अंशांनी कमी होती. मात्र किमान तापमानात वाढ झाली आहे. कुलाबा येथे २५.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. ही तापमान अनुक्रमे ३.४ आणि ३.७ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होती.
कोकण किनारपट्टीजवळ निर्माण झालेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीची प्रणाली सध्या महाराष्ट्राच्या अंतर्भागाकडे सरकली आहे. याचा परिणाम राज्यातील विविध भागांच्या तापमानावर होत असून शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ नोंदवली गेली.
उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढले आहे. मालेगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस तर नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर ८ आणि ९ मार्च रोजी पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला असून ९ मार्च रोजी पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हा अलर्ट लागू राहणार आहे.
दरम्यान विदर्भातही तापमान वाढू लागले आहे. शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा ६.३ अंशांनी अधिक आहे. अकोला येथे ४०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.