Mumbai Weather : दोन दिवसांचा दिलासा संपणार; मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुन्हा उष्ण-दमट हवामानाचा यलो अलर्ट

Published : Mar 07, 2026, 09:06 AM IST
heat wave

सार

Mumbai Weather : मुंबईत दोन दिवसांच्या उष्णतेनंतर तापमानात थोडी घट झाली असली तरी हा दिलासा तात्पुरता आहे. ८ आणि ९ मार्च रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुन्हा उष्ण व दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Weather : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेनंतर शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाल्याने मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा फार काळ टिकणार नसल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ८ आणि ९ मार्च रोजी मुंबई महानगर प्रदेशात पुन्हा उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईतील तापमानात घट, पण किमान तापमान वाढले

शुक्रवारी मुंबईतील तापमानात किंचित घट नोंदवली गेली. सांताक्रूझ येथे ३४.६ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ही दोन्ही तापमान सरासरीपेक्षा सुमारे चार अंशांनी कमी होती. मात्र किमान तापमानात वाढ झाली आहे. कुलाबा येथे २५.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. ही तापमान अनुक्रमे ३.४ आणि ३.७ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होती.

चक्रीय वातस्थितीमुळे हवामानात बदल

कोकण किनारपट्टीजवळ निर्माण झालेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीची प्रणाली सध्या महाराष्ट्राच्या अंतर्भागाकडे सरकली आहे. याचा परिणाम राज्यातील विविध भागांच्या तापमानावर होत असून शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ नोंदवली गेली.

उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले

उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढले आहे. मालेगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस तर नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

या पार्श्वभूमीवर ८ आणि ९ मार्च रोजी पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला असून ९ मार्च रोजी पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हा अलर्ट लागू राहणार आहे.

विदर्भात पारा ४० अंशांच्या पुढे

दरम्यान विदर्भातही तापमान वाढू लागले आहे. शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा ६.३ अंशांनी अधिक आहे. अकोला येथे ४०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hormuz Strait Tanker Attack : होर्मुझ सामुद्रधुनीत टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; मुंबईतील 33 वर्षीय खलाशाचा मृत्यू
कल्याण-डोंबिवलीकरांची चंगळ! मेट्रो ५ आणि १२ चा थेट बदलापूर-टिटवाळ्यापर्यंत विस्तार; प्रवासाचा वेळ वाचणार!