Published : Jul 23, 2025, 09:24 AM ISTUpdated : Jul 23, 2025, 09:26 AM IST
मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय कोकणासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलॅर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि कोकण विभागासाठी यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
25
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
आज, 23 जुलै रोजी मुंबईतील काही भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
35
ठाणे-नवी मुंबईतही पावसाचा तडाखा
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही मुसळधार पावसामुळे लोकलसेवा प्रभावित होत असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे.
पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने येथील ग्रामीण व किनारी भागांमध्येही यलो अलर्ट दिला आहे. मासेमारीवर निर्बंध शक्य असून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अती मुसळधार पावसाची शक्यता असून, दरड कोसळण्याचा धोका संभवतो. शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरूवात केली असून सततच्या पावसामुळे ते आनंदित आहेत. मात्र, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.