
Kalyan Murbad Highway : कल्याण-मुरबाड-माळशेजघाट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या नव्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या काही दिवसांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आणि वाहतूक अधिक सुलभ होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या आनंदावर विरजण घालणारा एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. पोटगाव परिसरात नव्या टोलनाक्याची उभारणी करण्यात येत असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
महामार्गावरील पोटगाव परिसरात प्रस्तावित टोलनाका सुरू झाल्यानंतर या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे. विशेषतः मुरबाड, शहापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच दैनंदिन कामांसाठी कल्याण, ठाणे आणि मुंबईकडे प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत रोजच्या प्रवासावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
नव्या टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांकडून शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये एसटी बस, काळी-पिवळी जीप, खासगी कार, मालवाहतूक आणि इतर व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. परिणामी, सार्वजनिक आणि खासगी दोन्ही प्रकारच्या वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सामान्य प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे.
महामार्गाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी काही ठिकाणी धोकादायक वळणे आणि सुरक्षेच्या समस्या अद्याप कायम असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात असताना सुरक्षिततेच्या मूलभूत बाबींकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत रस्ता पूर्णपणे सुरक्षित नसताना टोल आकारणीचा निर्णय का घेतला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महामार्गामुळे प्रवास सुलभ होणार असला तरी टोलच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या चाकरमान्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने स्थानिकांसाठी विशेष सवलत किंवा पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.