
Dadar Kabutar Khana : मुख्य कबुतरखाना हा दादरचाच असून नवीन कबुतरखाने मान्य नसल्याचं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले. “हे लोक आम्हाला लॉलीपॉप देत आहेत. दादरचा कबुतरखाना आम्ही खुला करूनच राहणार. मरते दम तक वो हम खोलके रहेंगे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच जीवदयेच्या मुद्द्यावर ते उपोषणास बसणार असल्याचे सांगत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले की, “माझं आंदोलन उपोषण आहे आणि त्यासाठी मला आझाद मैदानाची परवानगी मिळाली आहे. उद्या, 3 नोव्हेंबरपासून मी तिथे उपोषण सुरू करणार आहे.” जीवदयेच्या विषयावर ते आंदोलनातून ठाम भूमिका मांडणार आहेत.
सरकारवर विश्वास असल्याचे सांगतानाच मुनींनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. “न्यायालयाने मार्ग काढायला सांगितलं, तरी सरकारकडून तोडगा काढला जात नाहीय,” अशी टीका त्यांनी केली. जीवदया फक्त जैन समाजाशी जोडली जात असल्याची भावना चुकीची असून प्रत्येकजण कबुतरांना दाणे टाकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि विलेपार्लेतील धार्मिक स्थळांच्या घटनांचा विचार करता कबुतरखान्याच्या प्रकरणातही संवेदनशीलता आणि चिंतन आवश्यक असल्याचे जैन मुनी म्हणाले. “नवीन कबुतरखाने नकोत, आम्हाला जुनेच कबुतरखाने हवे. दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री आम्ही काढूनच रहाणार,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे देता येणार असून स्वयंसेवी संस्थांकडे व्यवस्थापनाची जबाबदारी असेल. सध्या बंद केलेले कबुतरखाने कायम बंद राहतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले.
1. वरळी जलाशय
2. लोखंडवाला बॅक रोड, अंधेरी (पश्चिम) – खारफुटी परिसर
3. ऐरोली–मुलुंड जकात नाका
4. गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम)