
Baba Siddique Murder Case : पत्नी शेहझीन सिद्दीकींची मुंबई उच्च न्यायालयात धाव, SIT स्थापन करण्याची मागणी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आता त्यांची पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांनी केलेला तपास अपूर्ण आणि पक्षपाती आहे.
याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांना खरे गुन्हेगार शोधण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्वतंत्र व निष्पक्ष पथकाकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेहझीन सिद्दीकी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तपास दरम्यान दिलेल्या महत्त्वाच्या जबाबांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. तसेच, काही राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की तपास दिशाभूल करणारा असून अर्ध्यावर सोडण्यात आला आहे. “डोंगर पोखरून उंदीर काढला,” असा शब्दप्रयोग करत त्यांनी पोलिसांच्या तपासावर टीका केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना हा हल्ला झाला.
या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अनेक संशयितांना अटक केली आहे. घटनेनंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात आणि बॉलिवूड क्षेत्रात खळबळ माजली होती.
लॉरेन्स बिश्नोई गँग सध्या भारतातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक मानली जाते. NIAच्या आरोपपत्रानुसार, बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे ७०० हून अधिक शूटर देशभर पसरलेले आहेत. १९९० च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने जशी आपली टोळी वाढवली, तशीच बिश्नोई गँगही विस्तारत असल्याचा उल्लेख NIAच्या अहवालात करण्यात आला आहे.