
मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार अबू आझमी यांनी “धार्मिक मुस्लिम वंदे मातरम् म्हणू शकत नाही” असे वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद उभा राहिला आहे. या वक्तव्याच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या मुंबईतील बांद्रा येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘वंदे मातरम्’ पठणाचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, "धार्मिक मुस्लिम व्यक्ती वंदे मातरम् म्हणू शकत नाही. आम्ही फक्त अल्लाहची उपासना करतो. देवत्व इतर कुणालाही देऊ शकत नाही." त्यांच्या या वक्तव्यावरून वाद वाढला आहे.
आझमी यांच्या वक्तव्याचा विरोध करत भाजप नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणा देत आझमी यांनी देशाबद्दल अनादर दाखवला असल्याचा आरोप केला. भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे की, "वंदे मातरम् हे देशभक्तीचे प्रतीक आहे. भारताच्या भूमीबद्दल आदर व्यक्त करणे हे धर्माच्या विरोधात नाही. लोकप्रतिनिधींनी समाजात योग्य संदेश द्यायला हवा."
वाद वाढल्यानंतर आझमी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "मी कुणालाही वंदे मातरम् म्हणायला अडवत नाही. पण कोणावरही बळजबरी करता येत नाही. धार्मिक श्रद्धा जपणे हा माझा अधिकार आहे." या प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजात धर्म विरुद्ध राष्ट्रगीत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील काही दिवसांत या विषयावर विधानसभेत किंवा सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा होण्याची शक्यता आहे.