
महाराष्ट्रातील ठाणे येथे डॉक्टरांवर झालेला हल्ला केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचाच मुद्दा बनलेला नाही. तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचाही मुद्दा बनला आहे. केडीएमसीच्या शास्त्री नगर रुग्णालयात एका शिवसेना नगरसेवकाने दोन डॉक्टरांवर हल्ला केला होता. त्यानंतर पीडित डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी पहिल्यांदाच त्यांच्या मनातील भावना सांगितल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते दोन्ही डॉक्टर या घटनेमुळे खूप घाबरले आहेत.
डॉ. सृष्टी बाविस्कर यांचे वडील, महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आणि तिचे सहकारी, डॉ. वैभव साळुंखे, अजूनही त्या घटनेच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांच्या मते, ते अनेकदा रात्री घाबरून जागे होतात आणि विचारतात, "कोणी हल्ला करतंय का?" त्या दोन्ही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याच्या बातम्यांचे खंडन केलं आहे. त्यांनी नोकरी सोडलेली नाही, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
डॉ. सृष्टीच्या आई-वडिलांनी राज्य सरकारला रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन केलं आहे. त्यांच्या मते, डॉक्टर अनेकदा पुरेशी झोप किंवा अन्नाशिवाय सलग ४८ ते ७२ तास काम करतात. त्यामुळे, जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर हि संपूर्ण कुटुंबासाठी दुःखाची गोष्ट आहे. डॉ. सृष्टीच्या आई, संगीता बाविस्कर म्हणाल्या की, जर डॉक्टरकडून चूक झाली, तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, परंतु कोणत्याही परिस्थितीत हिंसाचार मान्य होण्यासारखा नाही. त्यांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाईची मागणी केली.