
मुंबई: मुंबई महापालिकेच्या आजी माजी महापौरांमध्ये वाद झाल्याच दिसून येत आहे. महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला पेडणेकर यांनी हे आरोप बिनबुडाचे असून बालिश आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.
रितू तावडे यांनी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी जमावासह प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी दालनाचे चित्रीकरण केलं. तिथं उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेडणेकर यांनी दमदाटी केली, कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी केली. महापौरांच्या संवेदनशील अशा दालनात प्रवेश करून गोपनीयतेचा भंग केला, असं तावडे यांनी म्हटलंय.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटलं की, ३० मार्चपासून विविध नागरी प्रश्नांवर महापौरांना पत्र दिली होती. पण त्यांना महापौरांकडून उत्तर मिळालं नाही. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं त्या महापौर कार्यालयात गेल्या होत्या. या घटनेमुळं आजी-माजी महापौर यांच्यातील वाद अजून तीव्र झाला आहे.