
Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत असून, ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कधी थंडी, कधी उकाडा तर कधी पावसाचे वातावरण अशी विचित्र स्थिती निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर होताना दिसत आहे.
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. साधारणपणे उत्तर भारतात थंडी वाढली की महाराष्ट्रातही थंडीची लाट येते. मात्र यंदा डिसेंबरनंतर राज्यातील थंडी हळूहळू कमी झाली असून, सध्या थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे.
1 जानेवारी रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. भारतीय हवामान विभागाने याआधीच फेब्रुवारी महिन्यात फारशी थंडी जाणवणार नसल्याचा अंदाज वर्तवला होता. त्याचवेळी काही शहरांमध्ये वाढते वायू प्रदूषणही गंभीर समस्या बनत चालली आहे.
सध्याच्या परिस्थितीत राज्यात उकाडा वाढला असून, पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.आज छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पुण्यात मागील काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
सकाळी आणि रात्री गारठा जाणवत असताना, दुपारी कडक ऊन आणि उकाडा जाणवतोय. सायंकाळी ढगाळ वातावरण असल्याने पुणेकरांना एका दिवसात थंडी, उन्हाळा आणि पावसाची चाहूल—असा तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे.
हवामानातील सतत बदलामुळे सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखी यांसारख्या आरोग्य समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.