
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण अशी माहिती समोर येते की, उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 9 पैकी 6 खासदार बंड करणार असून ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. असं जर घडलं तर स्थापना दिवसाच्या आधीच उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका बसणार आहे. 9 पैकी 2 खासदार हे दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती आहे. तर 4 खासदार आज रात्री दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख दिल्लीत आहेत.
ठाकरे गटाचे हे खासदार वेगळा गट स्थापन करतील आणि मग शिंदेच्या शिवसेनेत सहभागी होतील अशी माहिती आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने ठाकरे गटात हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. 19 जूनच्या आधी हे खासदार शिंदेच्या सेनेत जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जे 6 खासदार फुटणार आहेत त्यापैकी एकाला केंद्रात मंत्रिपद दिले जाणार असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील रस्सीखेंच सुरु आहे. या खासदारांचे नेतृत्व मराठवाड्यातील एक खासदार करत असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मंत्रिपदासाठी 4 जण इच्छुक आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याबाबत देखील उत्सूकता आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलवली होती. ज्याला काही खासदार गैरहजर होते. त्यामुळे हे खासदार बंडखोरी करणार असल्याची माहिती आहे.
कारवाई होणार का?
राजकीय आणि कायदेशीर दृष्टीकोनातून संसदेत पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मूळ पक्षाच्या एकूण खासदारांपैकी किमान 2/3 (दोन तृतीयांश) खासदारांनी एकत्र येऊन निर्णय घेणे गरजेचे असते. ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. कायद्यानुसार, कारवाई टाळण्यासाठी किमान 6 खासदारांची गरज आहे. येथे 6 खासदार बंड करणार असल्याची चर्चा असल्याने, तांत्रिकदृष्ट्या ते संसदेत आपला वेगळा गट स्थापन करू शकतात किंवा शिंदे गटात (शिवसेना) विलीन होऊ शकतात.