
Maharashtra Weather Updates : मागील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये थोडा पाऊस झाला, पण हवेत खूप दमटपणा जाणवत होता. त्यामुळे तापमानात वाढ झाली. दुसरीकडे, राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या राज्यात मान्सून सक्रिय असून पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांत जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागांमध्ये समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे तिथं पाऊस आणि वाऱ्यांचा जोर वाढलेला दिसतो. राज्यातील घाटमाथ्याच्या भागांमध्ये आकाशात पावसाचे जाड ढग जमा झाले आहेत, तर इतर काही भागांत थोडीफार पावसाची उघडीप दिसून येते. हवामान विभागाने सांगितले आहे की विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये पावसाचा जोर सध्या थोडासा कमी होणार आहे.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पण आता हवामानात आणि वाऱ्याच्या दिशेत बदल होत असल्यामुळे पावसाला काही काळ विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पाऊस आता काही दिवस थांबेल आणि थेट 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोरात सुरू होईल.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आत्तापर्यंत आषाढ महिन्यात जोरदार पाऊस झाला. आता हाच पाऊस श्रावणसरींच्या स्वरूपात कोसळताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढचे 7 ते 8 दिवस ऊन-पावसाचा खेळ सुरू राहील आणि मधूनच हलकासा पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने सांगितले आहे की, 15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये विजांसह दमदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या काही दिवसांत कुठे जोरात, तर कुठे हलकासा पाऊस अनुभवायला मिळणार आहे.