
नवी दिल्ली | शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व खासदार सोबत आहेत, असं मी अजूनही मानतो. पण जर अजूनही जर पक्षातून फुटून जात असतील, तर महाराष्ट्राची जनता आता शांत बसणार नाही. 15 - 15 कोटी रुपये देऊन खासदारांची खरेदी झाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आता काय राडा व्हायचा असेल तो होईल. कारण यापूर्वी मोदींचा फोटो लावून निवडून आल्याचे आरोप होत होते. पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून ही लोकं निवडून आले आहेत. म्हणून हे वाटतंय एवढं सोपं नाही. दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, अरविंद सावंत हे तीन खासदार उपस्थित आहेत. पण अजूनही सहा खासदार अनुपस्थित आहेत.
संसदीय दलाची उद्या बैठक
संसदीय दलाची उद्या बैठक आहे आम्ही सर्वांना बोलावलेलं आहे, तेव्हा पाहूयात किती खासदार उपस्थित राहतात, तुमचे सर्व खासदार तुमच्यासोबत आहेत का आता, या प्रश्नाला संजय राऊत उत्तर देत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी यांना आपल्या मुलासारखं मानलं होतं, त्या जोरावर त्या प्रतिमेवरच जनतेने यांना खासदार म्हणून निवडून दिले, पण जनतेचाही यांनी विचार केलेला नाही, म्हणून महाराष्ट्रातील जनता आता शांत बसणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी राऊत म्हणाले
ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी मला जी माहिती आहे, यात पवनराजे निंबाळकर जे ओमराजे यांचे वडील होते, त्यांची 20 वर्षापूर्वी हत्या झाली होती. हा खटला सुनावणीला आला आहे, काल यावर हायकोर्टात सुनावणी होती. तर हा खटला तुमच्या बाजूने आम्ही लावून देऊ, तुम्ही सही करा, असं त्यांना सांगण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विचार करा कशी आश्वासनं दिली जातात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवी दिली, पण अनिल देसाई यांनी हे प्रकरण सावरत ही त्यांची भावना आहे, त्या विरोधात काही लोकं वागले, ही कुणाला वैयक्तिक शिवीगाळ नव्हती, तसं ते समजू नका, असं खासदार अनिल देसाई यांनी सांगितली. उद्या बैठक आहे, सर्वांना व्हीप बजावला आहे, कोण उपस्थित राहतंय ते पाहू यात, तेव्हाच खरी फूट समजणार आहे.