
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतो. विशेषतः कोकणातील शिमगोत्सवासाठी मुंबईतून हजारो कोकणवासीय दरवर्षी गावी परततात. रेल्वेची गर्दी, तिकीटांची मारामार आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यामुळे प्रवास त्रासदायक ठरतो. मात्र यंदा शिमग्याआधी राज्य सरकारने मोठी घोषणा करत समुद्रमार्गे फेरीसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या पुढाकारातून 1 मार्चपासून मुंबईतील भाऊचा धक्का येथून विजयदुर्ग येथे एम टू एम फेरी सुरू होणार आहे. या सेवेमुळे मुंबईहून अवघ्या सात तासांत कोकणात पोहोचता येणार आहे. या फेरीसेवेची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली असून पहिल्या दिवशी ते स्वतः या प्रवासात सहभागी होणार आहेत.
शिमगोत्सवासाठी वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन Central Railway ने 186 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई-सावंतवाडी, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या मार्गांचा समावेश आहे.
मुंबई-सावंतवाडी मार्गावरील गाड्यांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी शिमग्यासाठी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. समुद्रमार्गे फेरीसेवा आणि रेल्वेच्या विशेष गाड्यांमुळे यंदा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.