
Monsoon 2026 : राज्यात अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढू लागली असून Mumbai, Thane आणि Navi Mumbai येथे ढगाळ वातावरणासह तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अहवालामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली असून यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र स्कायमेटच्या अंदाजानुसार ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता असून जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे देशभरात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची तब्बल 30 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.
El Niño ही हवामान स्थिती प्रशांत महासागरातील तापमान वाढल्यामुळे तयार होते. याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. स्कायमेटच्या मते, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील तापमान वाढत असून त्यामुळे एल निनोचा प्रभाव वाढू शकतो. परिणामी जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, Indian Ocean Dipole (IOD) मुळे एल निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनच्या सुरुवातीला मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते, मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता कायम आहे. याचा परिणाम विशेषतः मध्य आणि पश्चिम भारतावर जाणवू शकतो.
महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र याच काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याकडून अद्याप अधिकृत मान्सून अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र या आठवड्यात आयएमडीकडून पहिला अहवाल येण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची सुमारे 40 टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.