
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकालही जाहीर करण्यात येणार आहे.
विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, श्रीकांत शिंदे, अमोल मिटकरी, शशीकांत शिंदे, गोपीचंद पडळकर, रजनीसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रविण डाके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे महायुतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवारासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे असलेले एकूण 234 आमदारांचे संख्याबळ पाहता त्यांचे 8 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ 49 असल्याने त्यांना एकच जागा निश्चित मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या जागेसाठी आवश्यक 10 मतांची जुळवाजुळव करणे सध्या कठीण दिसत आहे.
राज्यातील विधानसभेतील पक्षनिहाय ताकद या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40, काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10, शिवसेना (ठाकरे गट) 20, समाजवादी पक्ष 2, तर इतर लहान पक्ष आणि अपक्ष आमदार मिळून उर्वरित संख्या आहे.
महायुतीच्या भक्कम संख्याबळामुळे बहुतेक जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी अतिरिक्त उमेदवारी आणि क्रॉस-व्होटिंगच्या शक्यतेमुळे निवडणूक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.