288 जागांची तयारी ठेवा, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे पाचवे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil Hunger Strike News : मागील 11 महिन्याच्या आंदोलन काळातील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी पाचवे उपोषण सुरू केले आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 20, 2024 10:01 AM IST

Manoj Jarange Patil Hunger Strike News : मराठा आरक्षणासाठी सरकारने धोका दिल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याची वेळ आली आहे. शरीर किती दिवस साथ देईल माहीत नाही. समाज उपोषण करू नका अशी विनंती करत आहे, मात्र त्यांच्यासाठीच बेमुदत उपोषणास सुरुवात करत आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील 11 महिन्यांच्या काळात मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथील पाचवे उपोषण आहे. उपोषण कठोर करणार असून या काळात पाणी, औषधोपचार घेणार नसल्याचे जरांगे यांनी यावेळी जाहीर केले.

मागेल त्या मराठ्याला सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा कुणबी एकच आहेत, मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर सुशीलकुमार शिंदे यांनी काढला होता. सगेसोयरे आमची मागणी कायम आहे. सगळ्या केसेस मागे घ्या, हैद्राबाद सातारा गॅझेट लागू करा, तिन्हीही गॅझेट लागू करा, मराठा समाजाला ओबीसीत सरसकट आरक्षण द्या, या मागण्या जरांगे यांनी केल्या. तसेच कुणबी नोंदी शोधणं, सापडणं बंद आहे. मनुष्यबळ वाढवा, मोडी लिपी तज्ञांना सरकारने पेमेंट केलेलं नाही, त्यांचा पगार द्या, अधिकारी टाळाटाळ करतायत, शिंदे समितीचं काम वाढवा असेही जरांगे म्हणाले.

मराठा मुलांना नोकर भरती, शिक्षणात अडचण

नोकर भरती, प्रवेश यात मराठा मुलांना अडचणी येत आहे. कुणबी प्रमाणपत्र असूनही ओपनमध्ये ढकलल्या जात आहे.नोकर भरतीत जात प्रमाणपत्र घेतलं जातं नाही. मराठा मुलांना यांनी एकेक वर्ष बरबाद करायचं ठरवलं आहे. भरतीसाठी कुणबी प्रमाणपत्र असूनही ते घेतलं जातं नाही. ई डब्ल्यू एस , एस इ बी सी,कुणबी असे तिन्हीही पर्याय मराठा मुलांना भरतीसाठी सुरू ठेवा,नोकर भरतीत जात प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी 6 महिन्याची मुदत द्या. सारथीच्या मुलांना काय अडचणी आहेत जरा त्यांना विचारुन बघा. दादा तुम्ही म्हणता मुलींना शिक्षण मोफत केलं या अंतरवालीत बघा कुठं सुरुय मोफत शिक्षण बघा जरा असे चंद्रकात पाटील यांना जरांगे यांनी सुनावले.

निवडणूक झाली की सगळं बंद पडणार

सरकारने फक्त योजनेच्या नावाखाली लोक नादाला लावले आणि योजनेच्या अंमलबजावणीचा पत्ता नाही, म्हाडा, समृद्धी, शक्ती मार्गात हेच पाहायला मिळालं. मराठा, धनगरांना येड्यात काढायच आणि आरक्षण द्यायचं नाही असं तुम्हाला करायचं आहे का? लाडकी बहीण त्यासाठी आणलीय का, लाडका भाऊ त्यासाठी आणले आहे का? आता लाडकी मेव्हणी देखील येईल, सरकारने हा डाव टाकला आहे. निवडणूक झाली की हे सगळं बंद पडेल, लाडक्या बहिणीचे दिड हजार घेऊन काहीही होणार नाही.आमचं म्हणणं आहे हे देऊ नका आरक्षण द्या. आमच्या नोंदी रद्द करा असं भुजबळ म्हणतायत, नोंदी सगळ्याच भागातील रद्द करून तुम्ही तुमचं चांगलं करून घेणार का ? असा सवाल जरांगे पाटील यांनी भुजबळांना केला. धनगर समाजाने सरकारच्या नादाला लागू नये.छगन भुजबळच्या देखील नादाला लागू नये. हे गोर गरीबांना आरक्षण मिळू देणार नाही, अशी टीका जरांगे यांनी केली.

288 जागांची तयारी करा, 29 ऑगस्टला बैठकीत निर्णय घेऊ

येणाऱ्या काळात दौरे होणार तिथे ताकदीने तयारी करा. उपोषण सुटलं नाही तरीही रुग्णवाहिकेने दौऱ्यात येणार. कार्यक्रमाची तयारी करा राज्यात कुठेही आंदोलन करून मराठा समाजाने शक्ती दाखवू नये. 29 ऑगस्टला राज्यातील आंदोलनाची वर्षपूर्ती आहे. या दिवशी बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार पाडायचे का नाही हे ठरवू. 13 तारखेपर्यंत मी दौऱ्यावर असेल. पण 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान बैठका घेणार आहे. राज्यातील मराठा बांधवांनी आपापल्या भागाचा डेटा तयार ठेवावा. निवडणूकीची तयारी करावी. सगळ्या समाजाचा डेटा तयार ठेवावा. इच्छुकांनी सुद्धा बैठकीला यावे. 288 मतदार संघात तयारी करा. 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी यावे. आपल्याला सर्व जातींची मोट बांधायची आहे. सर्व समाजाला आमचं निमंत्रण आहे. त्यांनी चर्चेला यावे सर्व समीकरणं जुळले तर निवडणूक लढवता येईल. सर्वांनी एकमेकांच्या जातींना निवडून आणायचं आहे. क्रॉसिंग करायचं नाही. जर मराठा समाजाचं ठरलं तर मराठ्यांचे एकही मतदान वाया जाऊ द्यायचे नाही. आपण जर निवडणूक लढवू म्हटलं तर युती वाले खुश होतायत,निवडणूक लढवली नाही तर महाविकास आघाडीवाले खुश होतात.

आणखी वाचा : 

मुंबईतील ग्रँट रोडमध्ये इमारत कोसळली, 20 ते 22 जण अडकले

Share this article