
Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, या घडामोडींमुळे मुंबईपासून अमरावतीपर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर किती निर्णायक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अचलपूर मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले बच्चूकडू हे राज्यातील आंदोलनशील नेते म्हणून ओळखले जातात. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. अलीकडेच मेळघाटात त्यांनी ११ दिवसांची शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती. या आंदोलनांदरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधला होता, तसेच कर्जमाफीचे श्रेयही जाहीरपणे कडूंना दिले होते. त्यामुळेच आता विधान परिषदेसाठी दिलेली ऑफर ही केवळ राजकीय नव्हे तर रणनीतिक पाऊल मानली जात आहे.
मुंबईत झालेल्या शिंदे-कडू बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, कडूंनी सावध भूमिका घेत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘प्रहार’ जनशक्ती पक्षाची भूमिका या निर्णयात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कडू सत्तेसोबत जाणार की पुन्हा एकदा स्वतंत्र भूमिका कायम ठेवणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, साताऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेले राजकारण ‘हीन पातळीचे’ असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. “मी स्वभावाने रोखठोक आहे, आडवे आले तर सोडणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. या कार्यक्रमात शिंदे गटात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला, तसेच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडूंना दिलेली ऑफर ही राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकते. ‘प्रहार’चा आवाज विधान परिषदेत पोहोचणार की कडू स्वतंत्र राजकीय भूमिका कायम ठेवणार, यावर आगामी राजकीय चित्र अवलंबून असेल. विशेषतः अमरावती आणि विदर्भातील राजकारणात या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसू शकतात.