
पाटणा : बिहारच्या राजकारणात 'जन सुराज'चे संस्थापक प्रशांत किशोर सध्या जोरदार चर्चेत आहेत. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदाच स्वतः उमेदवार म्हणून उतरले आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अनेक वर्षं दुसऱ्या नेत्यांसाठी निवडणुकीची रणनीती आखणारे प्रशांत किशोर आता स्वतःच जनतेचा कौल मागत आहेत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, प्रशांत किशोर नेमके आहेत तरी कोण? त्यांचं शिक्षण किती झालंय आणि राजकारणात येण्याआधी ते काय काम करायचे? जाणून घ्या प्रशांत किशोर यांचं शिक्षण, करिअर आणि एकूण संपत्तीबाबत.
प्रशांत किशोर यांचा जन्म २० मार्च १९७७ रोजी बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण बिहारमध्येच झालं. त्यांनी बक्सरच्या एम.पी. हायस्कूलमधून दहावी आणि पाटणा सायन्स कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. यानंतर त्यांनी लखनऊ विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA) ही पदवी मिळवली.
पुढच्या शिक्षणासाठी ते हैदराबादला गेले. तिथे त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया (ASCI) मधून मास्टर ऑफ हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन (MHA) ही पदवी घेतली. या कोर्समुळे त्यांना आरोग्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचा चांगला अनुभव मिळाला. इतकंच नाही, तर २०१० मध्ये त्यांनी फ्रान्समधील CAVILAM Vichy संस्थेतून फ्रेंच भाषेचं विशेष प्रशिक्षणही घेतलं.
हे फार कमी लोकांना माहीत आहे की, राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांचं करिअर पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात होतं. त्यांनी जवळपास आठ वर्षं संयुक्त राष्ट्रांच्या (UN) निधीवर चालणाऱ्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये काम केलं. या काळात ते आरोग्य, विकास आणि प्रशासनाशी संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांचा भाग होते. याच अनुभवामुळे त्यांना सरकारी धोरणं आणि व्यवस्था जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.
संयुक्त राष्ट्रातील काम सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (I-PAC) नावाची कंपनी सुरू केली आणि निवडणूक रणनीतीकार म्हणून अल्पावधीतच मोठी ओळख निर्माण केली. त्यांच्या रणनीतीचा वापर देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी आणि पक्षांनी केला. नरेंद्र मोदी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एम.के. स्टॅलिन, वाय.एस. जगनमोहन रेड्डी आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांसारख्या नेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे.
दुसऱ्यांसाठी विजयाची गणितं मांडल्यानंतर, प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२४ रोजी 'जन सुराज' या स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये आपलं संघटन मजबूत करण्यावर भर दिला. आता २०२६ मध्ये होणाऱ्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतून ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. एक निवडणूक रणनीतीकार ते थेट लोकप्रतिनिधी बनण्याचा त्यांचा हा प्रयत्न बिहारच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करणारा मानला जात आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर यांच्याकडे एकूण ९६.०६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये २२.१९ कोटी रुपयांची चल (Movable) आणि ७३.८७ कोटी रुपयांची अचल (Immovable) संपत्ती आहे. त्यांनी ५.७७ कोटी रुपयांचं बँक कर्ज असल्याचंही जाहीर केलं आहे. तर त्यांच्या पत्नी डॉ. जाह्नवी दास, ज्या आसाममध्ये डॉक्टर आहेत, त्यांच्या नावावर सुमारे १०२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यावरून स्पष्ट होतं की, राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीच प्रशांत किशोर यांनी व्यावसायिक जीवनात एक भक्कम आर्थिक पाया तयार केला होता.