
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील लढ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार होते, आहेत आणि राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष कोणाकडे आहे हे ठरवताना आमदार-खासदारांच्या संख्येपेक्षा संघटना कोणासोबत आहे, याला पक्षाच्या घटनेनुसार अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार गटाविरोधातील न्यायालयीन लढा व्यक्तीविरोधात नसून प्रक्रियेविरोधातील आणि नैतिकतेची लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या. शरद पवारांकडून पक्ष चुकीच्या पद्धतीने हिरावून घेण्यात आला आणि त्यांच्यावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगात विरोधक चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील, मात्र न्यायालयात ते जिंकू शकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात आठ सुनावण्या झाल्याचा आणि शरद पवार प्रत्येक सुनावणीला उपस्थित असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या महाविकास आघाडीबाबतच्या वक्तव्यावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 2014 आणि 2019 मधील निर्णयांबाबत तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारावे लागेल, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा चुकीच्या चौकटीत ठेवले जाते, असा दावा करत सुळे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी मात्र नियमित संवाद असल्याचे सांगितले. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत अशी भूमिका असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.