काँग्रेसने देशाचा विकास मंदावला, आम्ही विक्रमी वेगाने केले काम - PM नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : काँग्रेसने देशाच्या विकासाचा वेग मंदावला. पण आमच्या सरकारने मागील 10 वर्षामध्ये विक्रमी वेगाने काम केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Harshada Shirsekar | Published : Feb 10, 2024 5:48 AM IST / Updated: Feb 10 2024, 06:47 PM IST

PM Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला. काँग्रेसने देशाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. आम्ही विक्रमी गतीने काम केले आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मागील सरकारने 70 वर्षांमध्ये केलेल्या कामाची तुलना NDA सरकारद्वारे 10 वर्षांत करण्यात आलेल्या कामाशी देखील केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "वर्ष 2014पर्यंत सुमारे 20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते. 10 वर्षांमध्ये आम्ही 40 हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले."

10 वर्षांमध्ये 30 हजार किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्ग बांधले

पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, “NDA सरकारने रस्तेनिर्माण बांधणीच्या क्षेत्रामध्ये खूप काम केले आहे. 70 वर्षामध्ये निर्माण केलेले रस्ते मार्ग आणि 10 वर्षांमध्ये निर्माण केलेल्या रस्तेमार्गामध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही. गेल्या सात दशकामध्ये 18 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले. गेल्या 10 वर्षांमध्ये 30 हजार किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले.”

मेट्रो रेल्वेचे जाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, “वर्ष 2014 पर्यंत सात दशकांमध्ये भारतामध्ये 250 किलोमीटरहून कमी प्रमाणात मेट्रो रेल्वेचे जाळे तयार झाले होते. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही 650 किलोमीटरहून अधिक मेट्रो रेल्वेचे जाळे तयार केले आहे. वर्ष 2014पर्यंत भारतातील 3.5 कोटी घरांमध्ये पाण्याच्या नळाचे कनेक्शन उपलब्ध होते. आम्ही वर्ष 2019मध्ये जल जीवन मिशन सुरू केले. गेल्या 5 वर्षांत आम्ही ग्रामीण भागातील 10 कोटींहून अधिक घरांमध्ये नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला आहे”.

काँग्रेसने केवळ गरिबी हटावचा दिला नारा

गरिबी हटाओ या काँग्रेसच्या घोषणेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाचार घेतला. गरिबी हटाओ ही केवळ घोषणाच राहिली. ऑनग्राउंड याबाबत कोणतेही ठोस काम केले गेले नाही. गरिबीसंदर्भातील निर्णय एसी रूममध्ये बसून घेण्यात आले. त्यामुळे देशाची यातून सुटका होऊ शकली नाही, यात कोणतेही आश्चर्य नाही. वर्ष 2014मध्ये जेव्हा एक गरीब व्यक्ती पंतप्रधान झाला तेव्हा परिस्थिती बदलली, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

“माझी जी पार्श्वभूमी आहे, त्यानुसार गरिबीशी कसे लढायचे हे मला माहित आहे. आपले सरकार प्रत्येक पातळीवर गरिबीशी लढत आहे. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत", असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

आणखी वाचा

Budget Session : 'चला तुम्हाला शिक्षा देणार आहे', म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भाजप, विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत लंच (See Photos)

Bharat Ratna : पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि MS स्वामीनाथ यांना भारतरत्न देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

White Paper : 'UPAने 10 वर्षात अर्थव्यवस्थेची केली दुरवस्था', मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर

Share this article