
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितलं की, भारताच्या उत्पादन, नवकल्पना आणि डिजिटल अर्थव्यवस्थेतील वेगवान प्रगतीमागे देशातील तरुण पिढी हीच मुख्य शक्ती आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी शिक्षण, समानता आणि सेवा ही राष्ट्रीय प्रगतीची पायाभरणी असल्यावर भर दिला.
भारताची सेमीकंडक्टर निर्मिती, मोबाईल उत्पादन आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून झालेली प्रगती याचं थेट श्रेय पंतप्रधानांनी तरुणांच्या क्षमतेला दिलं.
म्हैसूरमध्ये स्वामी विवेकानंद कल्चरल युथ सेंटर - 'विवेका स्मारक'च्या उद्घाटनावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांतील तरुण पिढीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "आज भारत सेमीकंडक्टर निर्मितीच्या नव्या प्रवासात वेगाने पुढे जात आहे, ते केवळ भारतीय तरुणांच्या सामर्थ्यामुळे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, यामागेही तरुणांचीच ताकद आहे. भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे, याचं श्रेयही तरुणांनाच जातं. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन निर्माता बनला आहे, तेही तरुणांच्याच बळावर. भारतात तयार झालेले डिजिटल सोल्यूशन्स आज जगातील अनेक देशांना प्रेरणा देत आहेत, आणि यामागेही तरुणांचीच शक्ती आहे."
ऐतिहासिक प्रगती आणि शैक्षणिक सुधारणांवर बोलताना पंतप्रधान पुढे म्हणाले, "त्या काळापासून ते आजपर्यंत भारतीय तरुणांनी एक मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेले तरुण आज जागतिक विकासाला गती देत आहेत. स्वामी विवेकानंदांनी तरुणांच्या शिक्षणाला राष्ट्र उभारणीचा सर्वात मजबूत पाया मानलं होतं. त्यांनी देशाच्या विकासासाठी समानतेलाही शिक्षणाएवढंच महत्त्वाचं मानलं. शिक्षण किंवा संधींमध्ये कोणताही भेदभाव होऊ नये, हे आता देशाचं ध्येय बनलं आहे. आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रांतील शिक्षण मातृभाषेतून घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे भाषेमुळे संधींमध्ये होणारा भेदभाव दूर होण्यास मदत होत आहे."
उच्च शिक्षणाच्या विस्ताराकडे लक्ष वेधताना पंतप्रधान मोदींनी नमूद केलं की, देशात आता ८२३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे १.४ लाख एमबीबीएस जागा आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि मातृभाषेतील शिक्षणामुळे हे शक्य झालं आहे.
संस्थात्मक वाढ आणि राष्ट्र उभारणीच्या मूल्यांवर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोणत्याही देशात, तरुणांची क्षमता तेव्हाच राष्ट्रीय शक्तीत बदलते, जेव्हा त्यांना योग्य संधी, योग्य दिशा आणि मोठी स्वप्नं पाहण्याचा आत्मविश्वास मिळतो. यात आपल्या शिक्षण संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. आज भारतात सुमारे १.४ लाख एमबीबीएस जागा आहेत, तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८२३ झाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण भारतीय तरुणांना २१व्या शतकासाठी तयार करण्याचं एक माध्यम बनत आहे. मला खात्री आहे की 'विवेका स्मारक' साधकांसाठी आणि भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीचं तीर्थक्षेत्र बनेल. या स्मारकाच्या माध्यमातून आपण असे तरुण घडवले पाहिजेत, जे समाज आणि राष्ट्राचं हित, गरीब आणि वंचितांचं दुःख स्वतःच्या सुखाच्या वर ठेवतील. ज्या तरुणांसाठी 'राष्ट्र प्रथम' हेच सर्वोच्च मार्गदर्शक तत्व असेल आणि भारतमातेची सेवा हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असेल."
स्वामी विवेकानंदांच्या "शिव ज्ञाने, जीव सेवा" (प्रत्येक जीवाची सेवा हीच शिवसेवा) या संदेशाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, नव्याने उद्घाटन झालेलं 'विवेका स्मारक' भावी पिढ्यांना राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देईल. "मला विश्वास आहे की 'विवेका स्मारक' साधकांसाठी आणि भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीचं तीर्थक्षेत्र बनेल. या स्मारकाच्या माध्यमातून आपण असे तरुण घडवले पाहिजेत, जे समाज आणि राष्ट्राचं हित, गरीब आणि वंचितांचं दुःख स्वतःच्या सुखाच्या वर ठेवतील. ज्या तरुणांसाठी 'राष्ट्र प्रथम' हेच सर्वोच्च मार्गदर्शक तत्व असेल आणि भारतमातेची सेवा हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असेल," असं पंतप्रधान म्हणाले.
नव्याने उद्घाटन झालेलं 'विवेका स्मारक' हे एक युवा-केंद्रित तीर्थक्षेत्र आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे. स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीवर आधारित शिस्त, खिलाडूवृत्ती आणि राष्ट्रसेवेचे आदर्श तरुणांमध्ये रुजवण्याचा याचा उद्देश आहे.