
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मेयर बंगल्यासाठी काढण्यात आलेल्या नव्या टेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतर पुन्हा नव्या टेंडरची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. मुंबईकरांच्या पैशांचा फिजूल खर्च होत असल्याचा आरोप करत, हेरिटेज बंगल्याची अनावश्यक तोडफोड करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. टेंडरमध्ये इंटिरिअर, वॉटर टँक आणि नॉईज बॅरिअरचा उल्लेख असल्याचा दाखला देत, या कामांची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. जुने फर्निचर जतन करण्याऐवजी ते कमी किमतीत विकून नवे फर्निचर घेतले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. याशिवाय संबंधित टेंडरची चौकशी करण्याची मागणी करत, नॉईज बॅरिअरमुळे शेजारील बांधकामाला फायदा होत आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. प्रशासन वारंवार प्रस्ताव मागे घेत असल्यास असे प्रस्ताव येतातच कसे, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी टीका केली.