
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे प्रमुख वैज्ञानिक बिक्रम सिंह यांनी महाराष्ट्रातील पावसाचा ताजा अंदाज दिला. पालघर आणि नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला असून नंदुरबारसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून पुढील दिवसांत पावसाची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र 60 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अद्याप पावसाची तूट असल्याचेही त्यांनी सांगितले.