
मुंबईत एका मृत महिलेच्या बँक खात्यातून तब्बल २९.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी सेंट्रल सायबर पोलिसांनी एका खासगी बँकेच्या माजी मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मृत ग्राहकाच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बदलण्यासाठी बनावट फॉर्मचा वापर करण्यात आला आणि त्यानंतर ही रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणात राम पाल नावाचा आणखी एक बँक कर्मचारी फरार आहे.
विमला पाटील नावाच्या मृत महिलेच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी परस्पर बदलण्यात आल्याची तक्रार बँकेकडे आली, तेव्हा हा सगळा घोटाळा उघडकीस आला.
बँकेने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली. तेव्हा असं समोर आलं की, जुलै २०२५ मध्ये बँकेच्या ताडदेव शाखेत एक 'कस्टमर रिक्वेस्ट फॉर्म' जमा करून खात्याचे डिटेल्स बदलण्यात आले होते. पण, या फॉर्मवरील सही आणि बँकेच्या रेकॉर्डमध्ये असलेल्या विमला पाटील यांच्या सहीमध्ये तफावत होती.
चौकशीदरम्यान, वर्मा नावाच्या कर्मचाऱ्याने बँकेला सांगितलं की, मॅनेजर पांजवानी यानेच त्याला हे बदल करण्याचे निर्देश दिले होते.
खात्याचे डिटेल्स बदलल्यानंतर आरोपींनी पाटील यांच्या खात्यात सहज प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यांनी १४.८७ लाख रुपयांच्या दोन फिक्स डिपॉझिट (FD) मुदतीपूर्वीच तोडल्या. ही रक्कम नंतर RTGS, NEFT, UPI, IMPS आणि मोबाईल बँकिंगद्वारे अनेक वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवण्यात आली.
तपासात असंही कळालं की, ५-५ लाखांचे तीन RTGS व्यवहार दुसऱ्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. इतकंच नाही, तर काही पैसे दागिन्यांच्या दुकानांमध्येही वापरण्यात आले, ज्यामुळे या मनी ट्रेलमध्ये आणखी एक नवीन अँगल समोर आला आहे.
सेंट्रल सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
बँकेच्या आरोपानुसार, पांजवानी, वर्मा आणि राम पाल यांनी मिळून मृत महिलेच्या नावाने बनावट रिक्वेस्ट फॉर्म तयार केला आणि त्यावर तिची खोटी सही केली. हा एक सुनियोजित कट होता.
आता पोलीस या कटामागे आणखी कोण आहे का, याचा तपास करत आहेत. तसेच, काढलेले पैसे कुठे-कुठे गेले याचा माग काढला जात आहे आणि फरार आरोपी राम पाल याचाही शोध सुरू आहे.