
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थी शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. 24 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या बैठकीतील मिनिट्स विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याचे उईके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या 14 मागण्यांवर चर्चा झाली असून काही बाबी पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी मात्र ठोस निर्णय आणि कालबद्ध कार्यक्रम मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. 12,500 कथित बोगस लोकांच्या याद्या, भरतीबाबतचे संभाव्य वेळापत्रक तसेच 14 मागण्यांवरील ठोस निर्णयाची त्यांनी मागणी केली. सेंट्रल किचनसारख्या विषयांवरही निश्चित कालमर्यादा हवी असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. उईके यांनी विद्यार्थ्यांचा आपल्यावर आणि आपला विद्यार्थ्यांवर विश्वास असल्याचे सांगत त्यांच्यासोबत पुन्हा चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. 24 ऑगस्टच्या बैठकीतील निर्णयांची कागदपत्रेही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मागण्या पूर्णपणे मान्य होऊन ठोस कार्यक्रम समोर येईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी कायम ठेवली.