नवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास स्पष्टपणे दिसून येत असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाचे प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून ₹1,14,710 इतके झाले आहे. ही माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात दिली आहे.
पंकज चौधरी यांनी सांगितले की, २०१४-१५ मध्ये प्रति व्यक्ती निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNI) ₹72,805 इतके होते (स्थिर किमतींमध्ये). त्यानुसार, गेल्या दहा वर्षांत देशाच्या प्रति व्यक्ती उत्पन्नात ₹41,905 ची वाढ झाली आहे. ही वाढ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या प्राथमिक अंदाजांवर आधारित आहे.
राज्यानुसार मोठा फरक
पंकज चौधरी म्हणाले की, ही वाढ सर्व राज्यांमध्ये सारखी नाही. राज्यांमधील वाढ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “आर्थिक विकासाचे विविध टप्पे, औद्योगिक रचना, संरचनात्मक विषमता आणि शासकीय व्यवस्थांतील भिन्नता यामुळे प्रत्येक राज्यातील उत्पन्नवाढ वेगवेगळी असते.”
24
समावेशक विकासावर भर
सरकारकडून "सबका साथ, सबका विकास" या तत्वावर आधारित अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्या योजनांमध्ये गरीब व वंचित घटकांसाठी गरीबी निर्मूलन, सामाजिक सुरक्षा, उत्पन्नवाढीच्या संधी आणि जीवनमान सुधारणा या बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.
प्रति व्यक्ती उत्पन्नात आघाडीवर असलेली १० राज्ये/केंद्रशासित प्रदेश (२०२४-२५):
क्रमांक राज्य / केंद्रशासित प्रदेश प्रति व्यक्ती उत्पन्न (₹)
1 कर्नाटक ₹2,04,605
2 तामिळनाडू ₹1,96,309
3 हरियाणा ₹1,94,285
4 तेलंगणा ₹1,87,912
5 महाराष्ट्र ₹1,76,678
6 हिमाचल प्रदेश ₹1,63,465
7 उत्तराखंड ₹1,58,819
8 पुडुचेरी ₹1,55,533
9 आंध्र प्रदेश ₹1,41,609
10 पंजाब ₹1,35,356
34
महाराष्ट्राचा क्रम पाचवा, परंतु वाढीचा वेग तुलनेनं मंद
एकेकाळी देशाच्या आर्थिक राजधानीसाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र आता पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूने या यादीत मोठी झेप घेत देशातील सर्वाधिक प्रति व्यक्ती उत्पन्न असलेली राज्ये म्हणून आघाडी घेतली आहे. तेलंगणाही झपाट्याने पुढे सरकत आहे.
देशाच्या सरासरी उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असली तरी राज्यनिहाय विषमता अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. केंद्र सरकारकडून यासाठी अनेक सुधारणा कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. पुढील दशकात ही विषमता कमी करणे, हे धोरणकर्त्यांसमोरचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र एकूण चित्र पाहता, भारताची आर्थिक घडी अधिक बळकट होत असल्याचे नक्कीच स्पष्ट होते.