IndiGo Cancels Over 200 Flights Nationwide : इंडिगोने हवामान, तांत्रिक बिघाड आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे देशभरात 200 हून अधिक विमानसेवा रद्द केल्या आहेत. यामुळे चेन्नई, बंगळूरूसारख्या प्रमुख शहरांमधील प्रवासी त्रस्त झाले आहेत.
भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोला सध्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे विविध विमानतळांवर विमानसेवा सातत्याने रद्द होत आहेत. आज देशातील ८ शहरांमध्ये १०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. गेल्या दोन दिवसांत २०० हून अधिक विमानांनी उड्डाण केले नाही, अशी अधिकृत माहिती आहे.
24
इंडिगोचं स्पष्टीकरण
इंडिगो सेवा रद्द झाल्यामुळे बंगळूरू, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, सुरत, कोलकाता आणि चेन्नई विमानतळांवर मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक तास वाट पाहून प्रवासी त्रस्त झाले आहेत. 'खराब हवामान, तांत्रिक समस्या आणि नवीन कर्मचारी नियमांमुळे सेवांवर परिणाम झाला आहे. पुढील ४८ तासांत सेवा सामान्य होईल,' असे इंडिगोने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. बंगळूरूमध्ये ४२, दिल्लीत ३८, अहमदाबादमध्ये २५, हैदराबादमध्ये १९, सुरतमध्ये ८ आणि कोलकाता, चेन्नईमध्ये विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.
34
विमानसेवा रद्द
काही रिपोर्ट्सनुसार, सिस्टीममधील बिघाड आणि कर्मचाऱ्यांची कमतरता हे कारण असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने (FIP) हे नाकारले आहे. कंपनीच्या दीर्घकालीन धोरणांमुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे; अनेक वर्षांपासून कमी पायलट्सची भरती केल्यामुळे असे घडले, असा आरोप त्यांनी केला आहे.
अलीकडेच DGCA नियमांमध्ये बदल झाल्यामुळे पायलट्सची विश्रांतीची वेळ आठवड्यातून ३६ तासांवरून ४८ तास करण्यात आली आहे. तसेच, पायलट्सच्या आरोग्यावर देखरेख आणि दर तीन महिन्यांनी थकव्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक झाले आहे. नवीन नियमांचे पालन करण्यासाठी अधिक कर्मचारी आवश्यक असल्याने सेवेत व्यत्यय आल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.