
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरील Gen-Z कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी कोणालाही पैसे देऊन किंवा गाड्या लावून आणले नसल्याचा दावा त्यांनी केला. विविध कार्यक्रमांत मिळून सव्वा लाख तरुण सहभागी झाल्याचे, तर मुख्य कार्यक्रमाला सुमारे 20 ते 25 हजार तरुण उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 4,100 मुला-मुलींनी ढोल-ताशांसह आणि 585 ध्वजधारकांनी सहभाग घेत नवा विक्रम केल्याचेही फडणवीस म्हणाले. शिक्षण, कौशल्य, स्टार्टअप, क्रीडा आणि कला क्षेत्रातील तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी महिला अधिकारांबाबत केलेल्या वक्तव्यावरही फडणवीसांनी टीका केली. महिलांच्या अधिकारांबद्दल बोलताना महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणे ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात विविध निर्णय घेतल्याचे सांगत, वसतिगृहात जागा न मिळालेल्या 20 हजार विद्यार्थ्यांना राहणे, जेवण आणि अभ्यासासाठी प्रत्येकी 60 हजार रुपये देण्याच्या योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. काँग्रेसचा जमिनीशी संपर्क संपल्याची टीकाही फडणवीसांनी केली. मतदार याद्यांबाबत प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून संशयित नोंदींची पुन्हा तपासणी होईल आणि वैध मतदार बाहेर राहू नयेत यासाठी पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघात 23 हजार मृत आणि सुमारे 20 हजार डुप्लिकेट नावे आढळल्याचा उल्लेख करत मतदार याद्या सुधारल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.